पत्नीच्या अंगावर दागिने नाहीत, भरजरी शालू नाही, तर साधी साडी; स्वतःच्या अंगावर साधे कपडे, परंतु दानत मात्र राजाला लाजवेल अशी—अंबानी आणि अदानी यांच्या पलीकडची. यवतमाळ जिल्ह्यातील परशराम वढाई यांनी आपल्या आयुष्यातील कष्टाचं सारं काही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी उधळून दिलं.
चार मुलींनंतर शाळेला मानले पाचवं अपत्य
परशराम वढाई, घाटंजी तालुक्यातील वाढोणा खुर्द गावातील एक शेतमजूर, यांनी आपली दोन एकर जमीन, ज्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे, गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दान केली. त्यांनी या जमिनीचा उपयोग म्हातारपणासाठी पैसे म्हणून न करता, शाळेच्या इमारतीसाठी व मुलांच्या खेळासाठी मैदान म्हणून केला. “गावातील मुले शिक्षण घेऊन मोठी झाली व गावाचे नाव केले तर मला मनापासून समाधान मिळेल,” असं परशराम सांगतात.
अडाणी पण शिक्षणाची जाण :
स्वतः परशराम शिक्षण घेऊ शकले नाहीत, कारण गरिबीमुळे ते शाळेत जाऊ शकले नाहीत. तरीही शिक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या आयुष्यात पदोपदी अनुभवले. त्यांच्या चारही मुली—शोभा, जेबी, दुर्गा, माला—फक्त सातवीपर्यंत शिकल्या, पण त्या सर्वांच्या लग्नानंतर परशराम यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या संमतीने आपली दोन एकर जमीन शाळेला दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
दानाचा इतिहास :
३० ऑक्टोबर २०२१ रोजी, परशराम व त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी दोन एकर जमिनीचे दानपत्र तयार केले. या प्रक्रियेसाठी शाळेतील शिक्षकांनी वर्गणी गोळा करून नोंदणी शुल्क भरले. ही जमीन शाळेसाठी प्रशस्त इमारत बांधण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
कष्टमय जीवन, परंतु मोठे मन
परशराम यांनी आयुष्यभर शेतमजुरी केली, मोलमजुरी केली, आणि काटकसर करून टप्याटप्याने सात एकर जमीन घेतली. त्यांच्या कष्टांमध्ये सावित्रीबाईंची साथ होती. अशा परिस्थितीतही शिक्षणाबद्दल असलेल्या प्रेमामुळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून शाळेसाठी मोठं पाऊल उचललं.
गरीबांच्या शिक्षणासाठी वेडेपणा
“गरिबांची मुले जर चांगल्या शाळेत शिकली, मोठी झाली, आणि गावाचे नाव उंचावले, तर त्याचं श्रेय मला जाईल,” अशी त्यांची साधी भावना आहे. आज शाळेत १ ली ते ८ वीपर्यंतचे वर्ग आहेत, आणि गरीब मुलांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, असा परशराम यांचा विश्वास आहे.
परशराम वढाई: आजच्या काळातील जाणता राजा
परशराम यांच्या या दानामुळे त्यांनी फक्त जमिनीतून पीकच नव्हे, तर ज्ञानाच्या उगमाला खतपाणी घातलं आहे. त्यांच्यासारख्या व्यक्ती गावोगावी असतील तर गरिबांच्या शाळा कधीच बंद होणार नाहीत.
परमेश्वराकडे प्रार्थना:
श्री. परशराम आणि सौ. सावित्रीबाईंना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, ही मनोमन प्रार्थना. 🙏
अश्या दानशूर व्यक्तीबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कंमेंट करून सांगा.
लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
धन्यवाद !